राज ठाकरेंची आज डरकाळी, ठाकरे बंधुंच्या युतीनंतर मनसेच्या मेळाव्यात टार्गेटवर कोण कोण?

Foto
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पारंपरारिक आणि बहुचर्चित गुढीपाडवा मेळाव्याकडे मुंबईकरांचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुंबईतील शिवतीर्थ, शिवाजी पार्कवर हा मेळावा यंदाही होत आहे. शिवतीर्थावर आज संध्याकाळी मनसेचा पाडवा मेळावा होईल. गेल्यावर्षी मराठी भाषेच्या मुद्दावर आणि हिंदी सक्तीविरोधात दोन्ही बंधू एकत्र आले होते. दोन्ही बंधूंनी एकत्र मुंबई महापालिका निवडणूक लढवली. राज ठाकरे यांचा दसरा मेळावा गाजला आता गुढी पाडवा मेळाव्यात त्यांची तोफ पुन्हा धडाडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडवा मेळाव्याच्या भाषणात काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यांच्या भाषणात ते अनेक मुद्दांचा समाचार घेतात आणि त्याची चर्चा होते. आजच्या मेळाव्यात कोण कोण त्यांच्या टार्गेटवर असेल, याची उत्सुकता आहे.

आज शिवाजी पार्कवर सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते सभेला पोहोचणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सर्वानी वाजत गाजत येण्याचे मनसेच्या टीझरमधून आवाहन करण्यात आले आहे. मनसेच्या अधिकृत पेजवर दोन टीझर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या दमदार आवाजात त्यांचा रोख कुणाकडे आहे हे समोर आले आहे.
महाराष्ट्रात जे चाललंय ते पटत नाहीये? रोजच्या घटना पाहून मनस्ताप होत आहे. महाराष्ट्राची अवस्था पाहून अस्वस्थ झाला आहात? असे थेट काळजाला हात घालणारे प्रश्न विचारण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा रोख कोणत्या मुद्दावर आहे आणि ते कुणावर टीका करणार याचे संकेत मिळत आहेत. मी मराठी माणसांवर प्रेम करतो, मराठी भाषेवर प्रेम करतो आणि टोकाचं प्रेम करतो. महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी भाषेबाबत कोणाशीही तडजोड करणार नाही असा खणखणीत संदेश राज ठाकरे यांनी दिला. मराठी मुद्दावर कोणाशीच तडजोड करणार नसल्याचे इशारा देण्यात आला आहे.

ठाकरे युतीनंतर पहिला गुढीपाडवा मेळावा
गेल्यावर्षी शालेय स्तरावर हिंदी भाषा सक्ती आणि मराठी माणूस या मुद्दावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. दोन्ही बंधू एकत्र आल्याची जोरदार चर्चा झाली. राज्यालाच नाही तर देशाला त्याची भुरळ पडली. पण मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यात दोन्ही बंधूंना यश आले नाही. त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. मध्यंतरी महापालिकेतील काही पदांवरून मनसे नाराज झाल्याच्या वार्ता सुरू होत्या. पण पेल्यातील वादळं पेल्यातच जिरली. आजच्या सभेला उद्धव ठाकरे हजर राहणार का? उद्धव सेनेचे शिलेदार उपस्थित असतील का, याचीही चर्चा होत आहे. तर राज ठाकरे आजच्या सभेत राज्यातील कोणत्या मुद्दाला हात घालतात आणि कुणाला शिंगावर घेतात हा खरा प्रश्न आहे. आता कोणत्याही निवडणुका सध्या तरी पुढ्यात नाही. त्यामुळे मनसेची भूमिका काय असेल. पक्षाचे धोरण काय असेल याचीही चर्चा होत आहे.

भविष्यातील महाराष्ट्राचा वेध
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आणखी एक सोशल मीडियावर पोस्ट समोर आली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र नेक्स्ट पुढचा महाराष्ट्र म्हणत भविष्यातील महाराष्ट्राचा वेध असे म्हटले आहे.  शेतकर्‍यांचा, कष्टकर्‍यांचा, चाकरमान्यांचा आणि तरुणांच्या उज्वल भविष्याचा महाराष्ट्र म्हणत सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली आहे.